गाथा मंदिर वेळ - सकाळी ९ ते रात्री ९   |   आरती वेळ: सकाळी ९ वा. , संद्याकाळी ६ वा.   |   गाथा मंदिर गुगल नकाशा   |   देणगी योगदान
संपर्क - +९१ - ९७६३ ६३२०००, +९१ - ७७७४ ०८७६८१ 

समस्त जगस्थ भगवद्भक्त, विचारवंत, धर्मधन जनतेस कळविण्यात अत्यानंद होतो की जगात भारत देश श्रेष्ठ असून त्यातही श्रेष्ठ असलेला महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. येथे विश्वाला सन्मार्गाचे प्रबोधन करणारे अनेक संत अवतीर्ण झाले. यामध्ये विश्ववंद्य संतहृदयसम्राट जगद्गुरु श्री. तुकोबाराय हे कलशस्थानी 'तुका झालासे कळस' आहेत. श्री. तुकोबाराय हे आपले सर्वांचे श्रद्धास्थान असून मानवी जीवनाच्या सदाचार, सद्भक्ती व संस्कृतीचे ते प्राण आहेत. आजच्या विक्राळ कलीच्या कालचक्रात परिभ्रमण करणाऱ्या या जगात जी मानवता, एकता, अखंडता, विश्वबंधुता, सेवानिष्ठता, सद्धर्मपरायणता, अस्पृश्यरहितता, सहकारिता दिसून येते ती संतवाङ्मयाच्या प्रभावामुळे होय. आणि त्या संतवाङ्मयात स्वतेजाने सर्वांचे डोळे दिपविणारा दैदीप्यमान तेजोमय अष्टपैलू हिरा म्हणजे श्री. तुकोबारायांची अभंग गाथा होय. मानवाला भवसागरातून तारून पैलतीराला नेणारे हे एक विशाल जहाजच आहे.

महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यात श्री क्षेत्र देहू येथे श्री. तुकोबारायांचे मूळ पुरुष श्री. विश्वंभरबाबा हे महान भगवद्भक्त वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत श्री. पांडुरंगाचे निष्ठावान वारकरी होते. त्यांच्या अखंड वारीसेवेने भारावलेले भगवान वृध्दापकाळात संतुष्ट होऊन त्यांच्याकरिता देहू क्षेत्री आले व हे क्षेत्र पंढरीसमान झाले. आठ पिढ्यांच्या चरण सेवेच्या विलक्षण पुण्याईने प्रेममूर्ती नामदेवराय ह्या मिराशीच्या घराण्यात श्री. तुकोबारायांच्या रुपाने अवतरले तुका सर्वां श्रेष्ठ प्रिय आम्हां थोर। कां जो अवतार नामयाचा।। त्यांना मुख्य महाविष्णूंच्या चैतन्य परंपरेतील सद्गुरु श्री. बाबाजीचैतन्य यांनी स्वप्नात येऊन चैतन्य गुरुपरंपरेचा बोध व आवडता असा 'रामकृष्णहरि' हा मंत्र दिला. नित्यसिद्ध श्री. तुकोबाराय साधनसिद्ध होऊन त्या अखंड नामचिंतनाने परिपक्व झाले. श्री. नामदेवराय व बरोबर भगवान श्री पांडुरंग स्वप्नात आले आणि जागे करून प्रतिज्ञापूर्तीचे कवित्व करण्यास सांगितले. नामदेवे केले स्वप्नामाजी जागे। सवे पांडुरंगे येऊनिया।। सांगितले काम करावे कवित्व। वाऊगे निमित्त्य बोलो नको।। कवित्वाच्या आज्ञेनंतर वेद, शास्त्रे, पुराणे यांचे सार सामावलेली स्वानुभव रसमिश्रणाची अपौरुषेय वेदवाणी विश्वाच्या कल्याणासाठी अभंग रुपाने लीलया वर्षाव करु लागली. तत्कालीन धर्ममार्तंडांनी ही कृती अयोग्य मानून ती अभंगगाथा दगड बांधून इंद्रायणीच्या डोहात बुडवायला लावली. निंदक दुर्जनांच्या संदेह निरसनार्थ डोहाच्या तीरावर श्री. तुकोबारायांनी तेरा दिवस अन्नपाणी वर्ज करून निश्चक्र केले. चौदाव्या दिवशी देवाने बालवेशात दर्शन दिले व विलक्षण आश्चर्य असे की अभंग दगडाला घेऊन तरून कोरडे असे वर आले. या घटनेने अभंगांचे स्वपरतारकत्व सर्वत्र सिद्ध झाले. श्री. तुकोबारायांच्या अभंग वाणीचे महात्म्य तत्कालीन हिंदुधर्मतेज छत्रपती शिवाजी महाराज, समर्थ रामदास स्वामी, श्री. रंगनाथ स्वामी, धर्ममार्तंड रामेश्वर भट्ट, अनगडशहा फकीर इत्यादी सर्व स्तरीय भिन्नभिन्न श्रेष्ठांनी मान्य केले.

दगडालाही तारणाऱ्या या अभंगांचे दगडावर कोरुन चिरस्मारक झाले, तर हे अभंगगाथा मंदिर सर्वांना नित्य, दर्शनीय, अनुकरणीय, उपकारक ठरेल असा दिव्य संकल्प माझे ज्येष्ठ गुरुबंधु श्री. ह.भ.प. माधव महाराज मगर यांना स्फुरला. मग त्यांनी समविचारी आम्हां सर्वांना बरोबर घेऊन दिनांक १४/१/१९९२ रोजी 'श्री. संत तुकाराम महाराज वाङ्मय संशोधन मंडळ' या नावाने ट्रस्ट स्थापन केला आणि श्री. तुकोबारायांच्या वंशज श्रीमती केशरबाई विश्वनाथ मोरे यांच्या कुटुंबियांनी संकल्प केलेल्या त्यांच्या एका अल्प जागेवर २०/०२/१९९२ रोजी भूमिपूजनही केले. पण दुर्दैव असे की त्यानंतर अवघ्या साडे नऊ महिन्यातच श्री. माधव महाराज मगर पंढरपूर क्षेत्री ३/११/१९९२ रोजी श्री. पांडुरंग चरणी विलीन झाले. त्यानंतर सर्व विश्वस्तांनी सर्वांनुमते मला अध्यक्ष केले. वै. श्री. ह.भ.प. माधव महाराजांचा संकल्प पूर्ण व्हावा. दगडावर कोरुन हे अभंग स्मारक सर्व जगाच्या समोर यावे, जागतिक कीर्तीच्या अभंगांचे तसेच जागतिक कीर्तीचे भव्य स्मारक व्हायला हवे पण भूमीपूजनाच्या अल्प जागेभोवती विशाल जागा मिळेना. मग ती जागा सर्वानुमते रद्द केली व ते स्मारक अभंग तरलेल्या अनुष्ठानाच्या प्रासादिक, प्रासंगिक अशा जागेवरच व्हावे. ही भगवंताची व श्री. तुकोबारायांची इच्छा असावी म्हणून ती जागा मिळविण्यांत दोन वर्षांनी यश आले. १९९५ ला चार एकर जागा ट्रस्टने विकत घेतली.

उत्साहाने कार्याला गती मिळाली. अनेक उदार भाविक भक्तांच्या साक्षीने त्या प्रासंगिक व प्रासादिक जागेवर कार्तिक वद्य १२ सोमवार दिनांक २०/११/१९९५ रोजी दुपारी अडीच वाजताच्या शुभमुहूर्तावर श्री. ह.भ.प. गाथामूर्ती निष्ठावान वारकरी भोसरीकर माऊली, श्री. ह.भ.प. गु. विठ्ठल महाराज चौधरी, श्री. ह.भ.प. गु. नथुसिंग महाराज राजपूत, पद्मश्री श्री. ह.भ.प. अण्णासाहेब हजारे यांच्या शुभहस्ते भूमिपूजन झाले.

चार वेदांचे विवरण असलेले अभंग लक्षात घेऊन चार अष्टकोन अभंगांकरिता व या सर्व अभंगाचे उद्गाते म्हणजेच जगद्गुरु श्री. तुकोबाराय ते मध्यभागी पाचव्या अष्टकोनात अशी पाच अष्टकोनाची पौराणिक स्वरूपाकृती तयार झाल्यावर फाल्गुन वद्य द्वितीया ७/३/१९९६ या श्री. तुकोबारायांच्या सदेह वैकुंठगमनदिनी पायाभरणी समारंभ होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. बारा वर्षाच्या एक तपाच्या कालखंडात तीन मजली स्वरूपाचे पौराणिक पद्धतीचे नऊ शिखरे आणि ३३ कळस असलेले पाच अष्टकोनात्मक मंदिर तयार झाले. उच्च प्रतीच्या मार्बलवर अभंग कोरुन बन्सी पहाडपूर दगडाच्या नक्षीदार खांबाच्या वेलबुटीच्या कोंदणात ते बसविण्यात आले. जगद्गुरु श्री. तुकोबारायांच्या जन्माला चारशे वर्ष २००८ ला पूर्ण होत आहेत. याच उचित वेळी अखंड हरिनाम सप्ताहाच्या साधनेतून गाथा पारायणाच्या अनुष्ठानाने भव्य असा उद्घाटन सोहळा करुन ही मूर्तीस्थापना करण्याचे ठरविले व त्यासाठी श्री. तुकोबारायांच्या बीजोत्सवाचा सदेहवैकुंठगमन सोहळ्याचा काल निश्चित केला.

जागतिक कीर्तीच्या मंदिराला साजेशी भव्य अशी अनुष्ठान भावदर्शक मूर्ती असावी म्हणून शिल्पकलेत पद्मश्री पुरस्कार लाभलेले दिल्ली येथील महाराष्ट्र जन्मभूमी असलेले प्रसिद्ध शिल्पकार श्रीराम सुतार यांनी अति उत्कृष्ट भावदर्शक अशी पंचधातूची श्री. तुकोबारायांची मूर्ती तयार केली. जयपूर येथील प्रसिद्ध मूर्तिकाराकडून श्री. विठ्ठल रुक्मिणी व पूजेसाठी श्री. तुकोबारायांची छोटी मूर्ती तयार केली. नंतर अखंड हरिनाम सप्ताहात गाथा पारायण अनुष्ठानात फाल्गुन शुद्ध एकादशीच्या सुमुहूर्तावर १७/०3/२००८ रोजी ब्रह्मवृंदांच्या दोन दिवसाच्या मंत्रघोषात, परमपूज्य श्री. ह.भ.प. गु. विठ्ठल महाराज चौधरी, गु. नथुसिंग बाबा राजपूत, गु. विठ्ठल महाराज घुले, गु. मारोती महाराज कुरेकर, गु. माधव बाबा घुले, श्री. बापूसाहेब देहुकर, श्री. भानुदास महाराज देगलूरकर, श्री. बाजीराव महाराज जवळेकर, श्री. भास्करगिरि महाराज, श्री. ह.भ.प. आण्णासाहेब हजारे या श्रेष्ठ पुरुषांच्या शुभहस्ते मूर्ती स्थापना व कलशारोहण सोहळा संपन्न झाला. त्यानंतर भक्तनिवास, अन्नपूर्णाभवन, सत्संगभवन, गोशाळा, समर्थ रामदासस्वामी साधक निवास व संत श्री. तुकोबाराय गुरुकुल इत्यादी कामे पूर्णत्वाला गेली व अन्य काही विशेष कामे चालू आहेत व काही कामे चालू व्हावयाची आहेत. समस्त भाविकांचे श्रद्धास्थान होत असलेले तेच हे गाथामंदिर...